सोमवार, २२ मार्च, २०२१

बळीराज्याचं जगणं कठीण होत चाललंय

 बळीराज्याचं जगणं कठीण होत चाललंय  


           कोरोनाने भारतात प्रवेश केला आणि संपूर्ण देश थांबला. काही अत्यावश्यक सेवा सोडून बाकी सर्व थांबून गेलं. पण या कोरोनाच्या महामारीत बळीराजा थांबला नाही. कुठेही आपल्या कर्तव्यापासून मागे न हटता उभ्या जगाचे पोट आपल्या भरोश्यावर आहे. हा विचार मनात घेऊन शेतकरी कष्ट करतोय. शेतात पिकलेलं सोनं कवडीमोल भावात देऊन, खंबीरपणे उभा आहे. 40 ते 50 वर्षापूर्वी शेती हा व्यवसाय थोड्या वेगळ्या पद्धतीने केला जात होता. शेतातून मिळालेले उत्पन्न आपल्या कुटूंबाचे पोट भरेल एवढे धान्य ठेऊन मग उरलेल्या अन्नधान्याची विक्री केली जात होती. 



              कोरोनामुळे जग थांबलयं. पण शेतकरी थांबला नाही. कश्यासाठी तर फक्त जगासाठी.शेतकऱ्यांना भीती वाटत नसेल का? घरात आपल्याला पुरेल इतकं अन्नधान्य असून सुद्धा का राबतोय? सर्व देश जरी थांबला असेल पण शेतकरी थांबला तर सगळ्यांवर उपासमारीची वेळ येईल, हा विचार बळीराजाला शांत बसू देत नसावा. लॉकडॉऊनच्या काळात सगळ्यांनी चैनीच्या गोष्टी घेणं बंद केलं असेल पण अन्नाशिवाय कोणीच जगू शकत नाही. अन्न ही सर्वांची मूलभूत गरज आहे. पण याच बळीराजाला आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरावं लागतंय ही सगळ्यात मोठी शोकांतिका म्हणावी लागेल. 

         एका वयोवृद्ध शेकऱ्यांच्या मते शेती व्यवसाय सोपा नाही पण अवघड देखील नाही. निसर्गाची मिळालेली योग्य साथ बळीराजाला सुखी ठेवते. हवामान व्यवस्थित असले की पिकं चांगली येतात आणि पिकं चांगली आली की त्यात समाधान मानत  बळीराजाला कोणापुढे हात पसरण्याची गरज पडत नाही. पण सद्यस्थितीत निसर्गाचा प्रकोपच म्हणावा लागेल. हाताशी आलेली पिकं हातात येण्याआधीच गारपिटीचा सामना करावा लागतोय. कुठेतरी निसर्गाने शेतकऱ्यांना खूप साऱ्या वरदान दिल्या की काय असा प्रश्न उपस्थित होतोय.वर्षभरात नापिकी, दुष्काळ, पाणीटंचाई, वीज, गारपीट, महापूर, योग्य वेळी पाऊस न पडणे, रोगराई अशा कितीतरी समस्यांना तोंड देत शेती करणं ही खूप धैर्याची गोष्ट म्हणावी लागेल. 

            कोरोनाच्या महामारीला सुरुवात झाली तशी बळीराजाच्या समस्यांमध्ये देखील भर पडत राहिली. मागील वर्षी पाऊस चांगला असूनही आलेलं पीक हे बाजारात विकता आलं नाही. सद्यस्थितीत होत असलेल्या गारपिटीमुळे जे पीक हाताशी होतं ते देखील भुईसपाट झालय. झी 24 तासच्या  बातमीनुसार बुलढाणा शहरामध्ये 75% शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे. कोरोनामुळे वाहतूक बंद झाली आणि शेतीमालाला देखील मंदी आली. दुष्काळ, अवकाळी आणि कोरोना यामुळे शेतकरी हवालदिल झाला. लॉकडाऊनच्या काळात बऱ्याच शेकऱ्यांनी भाजीपाला फुकट वाटला. अनेक फळबागायत शेतकऱ्यांनी पिकं शेतातच फेकून दिली. उभ्या पिकात जनावरं सोडली. काबाडकष्ट करून पिकवलेलं सोनं हे डोळ्यासमोर मातीमोल झालं. 

           बळीराजाला खरं तर कोरोना योद्धाच म्हणावं लागेल. आपलं पोट भरत असताना जगाच्या पोटाची काळजी करणं काही सोपी गोष्ट नाही. म्हणून बळीराजाला कोरोना योद्धाच म्हणावं लागेल. पण दुर्दैव या सरकारला बळीराजाच्या प्रश्नाचे भान राहत नाही. सत्ताधाऱ्यांच्या पोकळ भाषणामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत. बळीराजाच्या बांदावर जाऊन त्याचे प्रश्न समजावून घेऊन ते सुटू शकतात. 



          मराठीमध्ये एक म्हण आहे 'जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे' पण इथं शेतीशी काही संबंध नसलेल्या लोकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर न बोललेलंच बरं. याचा शेकऱ्यांना काही एक फायदा होणार नाही. या देशातील बळीराजा जगला तरच देशाचं आर्थिक गणित बिघडणार नाही याचा सरकारला विसर पडतोय की काय कसा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात निर्माण होतोय. 

       काही वर्षापूर्वी उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी ही म्हण सर्रास वापरली जायची. शेती व्यवसाय हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा  कणा आहे. मग काय चुकले असेल त्या जगाच्या पोशिंद्याचे. शेतीवर सर्व जग अवलंबून असूनसुद्धा बळीराजा सुखी का नाही. का न्याय मिळत नसावा बळीराजाला असे कितीतरी प्रश्न सरकारच्या कचेरीत धूळ खात पडत आहे.  शेतीत पिकवलेलं अन्नच सर्वजण खातात मग बळीराजाच्याच प्रश्नावर का उत्तर मिळत नाही. या सत्ताधाऱ्यांनी शेतीसोडून अन्नधान्यासाठी दुसरा कोणता पर्याय विचारात घेतला नसेल ना? हा प्रश्न शेकऱ्यांना पडू लागला आहे.

                    

                        -- केतन कोलते ( पत्रकार ) 

रविवार, १३ सप्टेंबर, २०२०

*सिनेसृष्टीने गमावले 'हे' 21 हिरे*

 *सिनेसृष्टीने गमावले 'हे' 21 हिरे*
           

         2020 मधील सहा महिने उलटले. ‘कोरोना’चे सावट पूर्ण देशावर असताना मनोरंजन विश्वातूनही अनेक धक्कादायक बातम्या आल्या. या काळात सुशांत, ऋषी कपूर, इरफान खान, सैय्यद जाफरी अशा अभिनेत्यांचे  झालेले निधन चटका लावणारे होते, तर सुशांतसिंह राजपूत, मनमीत ग्रेवाल अशा उदयोन्मुख कलाकारांनी केलेल्या आत्महत्यांनी सर्वसामान्य प्रेक्षकही हेलावले. 


1)  सैय्यद जाफरी            (जगदीप) 


बॉलिवूडमधील प्रसिद्ध कॉमेडियन जगदीप म्हणजेच सैयद इश्तियाक अहमद जाफरी यांचे वयाच्या ८१व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.

शोले’ सिनेमातील त्यांच्या भूमिकेमुळे ते खूप प्रसिद्ध झाले. त्या सिनेमामुळे त्यांना सूरमा भोपाली म्हणून ओळखण्यात आले. हे नाव इतके प्रसिद्ध झाले की, त्यांनी या नावाने एका सिनेमाचे दिग्दर्शन देखील केले.



2. सुशांतसिंह राजपूत


बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतने 14 जून रोजी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. चाहते आणि कुटुंबातील सदस्यांसाठी हा मोठा धक्का आहे. पोलिस अद्याप या प्रकरणाचा तपास करत आहेत.


3. इरफान खान


हरहुन्नरी अभिनेता इरफान खान याची एक्झिट धक्कादायक होती. 29 एप्रिलला त्याचे निधन झाले. दोन वर्षांपूर्वी त्याला न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमरचे निदान झाले होते, मात्र हा तर अकाली निखळेल, अशी कल्पना कोणीही केली नव्हती.


4. ऋषी कपूर


हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांची कर्करोगाशी लढाई अपयशी ठरली. 30 एप्रिल रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. इरफानच्या निधनाच्या धक्क्यातून प्रेक्षक सावरत नाहीत, तोच दुसऱ्या दिवशी ऋषी कपूर यांच्या निधनाची दुर्दैवी वार्ता कानी आली होती.


5. चिरंजीवी सर्जा


कन्नड अभिनेता चिरंजीवी सर्जा याचे वयाच्या 39 व्या वर्षी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्याची पत्नी, अभिनेत्री मेघना राज गर्भवती असल्याने चाहत्यांचे काळीज तीळतीळ तुटत आहे.


6. वाजिद खान


संगीतकारद्वयी साजिद-वाजिद यांची जोडीही या वर्षी फुटली. 1 जून रोजी वयाच्या 47 व्या वर्षी वाजिद खान याचा हृदयविकाराचा धक्का बसल्याने करुण अंत झाला.


7. रत्नाकर मतकरी


ज्येष्ठ साहित्यिक आणि नाटककार रत्नाकर मतकरी यांचे वयाच्या 81 व्या वर्षी निधन झाले.


8. प्रेक्षा मेहता


‘क्राइम पेट्रोल’ फेम अभिनेत्री प्रेक्षा मेहताने मे महिन्यात आत्महत्या केली. ती फक्त 25 वर्षांची होती.


9. सेजल शर्मा


‘दिल तो हॅप्पी है जी’ मालिकेतील अभिनेत्री सेजल शर्मा हिनेही जानेवारी महिन्यात आत्महत्या केली.


10. मनमीत ग्रेवाल


‘आदत से मजबूर’ आणि ‘कुलदीप’ अशा मालिकांमध्ये काम केलेला अभिनेता मनमीत ग्रेवाल याने मार्चमध्ये आत्महत्या केली. तो अवघ्या 32 वर्षांचा होता.


11. सचिन कुमार


‘कहानी घर घर की’मध्ये अभिनय केलेले अभिनेते सचिन कुमार यांचे हृदयविकाराच्या झटक्याने मे महिन्यात निधन झाले.


12. साई गुंडेवार


‘रॉक ऑन!!’, ‘पीके’ आणि ‘बाजार’ या सारख्या चित्रपटात भूमिका केलेला मराठमोळा अभिनेता साई गुंडेवार याचे मे महिन्यात निधन झाले. अमेरिकेत कर्करोगावर उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. तो 42 वर्षांचा होता.


13. शफीक अन्सारी


‘क्राइम पेट्रोल’ फेम अभिनेते शफीक अन्सारी यांचे 10 मे रोजी निधन झाले. कर्करोगाशी झुंज देताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला.


14. जगेश मुकाटी


‘तारक मेहता का उलटा चष्मा’मध्ये दिसलेले लोकप्रिय अभिनेते जगेश मुकाती यांचे जूनमध्ये निधन झाले. श्वासोच्छवास करण्यास त्रास झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.



15. योगेश गौर


प्रख्यात गीतकार योगेश गौर यांचे मे महिन्यात वयाच्या 77 व्या वर्षी निधन झाले. ‘जिंदगी कैसी ये पहेली’ आणि ‘कभी दूर जब दिन ढल जाए’ अशी प्रसिद्ध गाणी त्यांनी लिहिली.


16. अन्वर सागर


‘वादा रहा सनम’ आणि ‘ये दुआ है मेरी रब से’ सारखी गाणी लिहिणारे गीतकार अन्वर सागर यांचे वयाच्या 70 व्या वर्षी निधन झाले.


17. मोहित बघेल


सलमान खानच्या ‘रेडी’ चित्रपटात झळकलेला अभिनेता मोहित बघेल मे महिन्यात काळाच्या पडद्याआड गेला. मोहितला कॅन्सर असल्याची माहिती आहे.


18. बासु चटर्जी

प्रख्यात चित्रपट निर्माते बासु चटर्जी यांचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले. ‘छोटीसी बात’ आणि ‘चमेली की शादी’ अशा हलक्याफुलक्या चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले होते.


19. अनिल सुरी

          बॉलिवूड निर्माते अनिल सुरी यांनी जून महिन्यात जगाचा निरोप घेतला. त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती.



20. इम्तियाज खान


हिंदी चित्रपट अभिनेते इम्तियाज खान यांनी मार्चमध्ये अखेरचा श्वास घेतला. ते अभिनेते अमजद खान यांचे बंधू. त्यांनी ‘यादों की बरात’ आणि ‘नूरजहां’ सारख्या चित्रपटात काम केले होते.


21.  निम्मी


बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री निम्मी यांचे वयाच्या 87 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.

शनिवार, ८ ऑगस्ट, २०२०

अभिनयाच्या दादाची आज जयंती

 अभिनयाच्या दादाची आज जयंती


आज दादा कोंडके यांचा आज वाढदिवस. सगळ्याचा हृदयात स्थान निर्माण केलेल्या दादांना विसरणे कठीणच ! 

कृष्णा कोंडके ऊर्फ दादा कोंडके (८ ऑगस्ट १९३२ – १४ मार्च १९९८) हे मराठी अभिनेते व चित्रपट-निर्माते होते. मराठी चित्रपटांतल्या विनोदी ढंगातील संवादफेकीमुळे त्यांच्या भूमिका लोकप्रिय झाल्या. अभिनयासोबतच त्यांनी प्रामुख्याने मराठी भाषेतील व सोबतच हिंदी व गुजराती भाषांतील चित्रपटांची निर्मितीही केली. प्रेक्षकांना नेमके काय हवे आहे याची चांगलीच जाण त्यांना होती.

८ ऑगस्ट १९३२ ला जन्मलेल्या दादा कोंडकेंचे खरे नांव कृष्णा कोंडके होते. नायगाव - मुंबईच्या मिलमजूर कामगाराच्या घरात गोकुळाष्टमीला जन्मलेल्या ह्या "कृष्णा" ने नावाचे सार्थक मराठी चित्रपट सृष्टीच्या पडद्यावर दाखवून दिले. बॅंड पथकातून सुरुवात करून हळूहळू वगनाट्ये, नाटके ह्यांनी सुरुवात केलेल्या दादांचे चित्रपट जीवन मेहनतीने साकारले गेले. नाटकांच्या निमित्ताने केलेल्या राज्यभराच्या दौऱ्यांनी दादांना सर्वसामान्यांसाठी करमणुकीचे महत्त्व व कोसा-कोसांवर बदलत जाणारी रसिकता कळली व हेच पुढे त्यांच्या यशाचे गमक सिद्ध झाले.


दादांचे बालपण नायगावच्या - मराठी कामगार वस्तीतल्या चाळीत गेले. लहानपणापासून खोड्याळ (काहीसे मवाली) असलेल्या दादांनी 'अपना बाजार' येथे नोकरी केली. सोडावॉटर बाटल्या..... नायगाव परिसरात - "बॅंडवाले दादा" ह्या नावाने त्यांना लोक ओळखू लागले. तेथेच त्यांना जीवाभावाचे मित्र मिळाले. सुपरस्टार झाल्यावरही दादा तेथे जात व जुन्या मित्र मंडळीत रमत.


कलेची सेवा बॅंड पथकाच्या मार्फत करणाऱ्या दादांनी मग 'सेवा दलात' प्रवेश केला. तेथून सांस्कृतिक कार्यक्रम व नंतर नाटके असा त्यांचा प्रवास सुरू झाला. दादा कोंडके यांनी ’दादा कोंडके आणि पार्टी’’ नावाचे एक कला पथकही काढले. प्रख्यात लेखक वसंत सबनिसांशी ते ह्याच संदर्भातून जोडले गेले. स्वतःची नाटक कंपनी उघडून त्यांनी वसंत सबनिसांना नाटकासाठी लेखन करावयास विनंती केली. तोवर वसंत सबनिसांना त्यांच्या "खणखणपूरचा राजा" ह्या नाटकातल्या भूमिकेने प्रभावित केलेलेच होते. हसरे व खेळकर व्यक्तिमत्त्व लाभलेल्या दादा कोंडकेंसाठी सबनिसांनी मदतीचा हात पुढे केला. सबनिसांनी लिहिलेल्या "विच्छा माझी पुरी करा" ह्या नाटकाने दादांना सुपरस्टार रंगकर्मी बनवले. १५०० च्या वर प्रयोग झालेल्या ह्या नाटकामुळे दादांना भालजींच्या चित्रपटात काम करण्याची संधी प्राप्त झाली. आशा भोसले 'विच्छा.... ' चा मुंबईतला एकही प्रयोग सोडीत नसत. त्यांनीच दादांना भालजींकडे पाठवले. दादांचे शब्दोच्चार एके ५६ रायफलमधून सुटणाऱ्या गोळ्यांसारखे सुसाट असायचे, पण नेमक्या ठिकाणी पॉज घेतल्याने प्रेक्षक अख्खे थिएटर (मग ते नाटकाचे असो की सिनेमाचे) डोक्यावर घ्यायचे.

१९६९ साली भालजी पेंढारकरांच्या "तांबडी माती" ह्या चित्रपटातून पदार्पण केलेल्या दादांनी मग मागे वळून बघितले नाही. तांबडी माती पाठोपाठ आलेल्या "सोंगाड्या -(१९७१)" ने दादांचे आयुष्य बदलून टाकले. 'सोंगाड्या' ही त्यांची प्रथम निर्मिती. वसंत सबनिसांनी लिहिलेल्या ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन गोविंद कुळकर्णींनी केले होते. बॉक्स ऑफिस वर सुपर डुपर हिट ठरलेल्या ह्या चित्रपटानंतर एकामागोमाग एक हिट चित्रपटांची लाईन लावून दिली. स्वतःच्या "कामाक्षी प्रॉडक्शन" ह्या चित्रपट निर्मिती कंपनीतर्फे १६ चित्रपट प्रकाशित करणाऱ्या दादांनी ४ हिंदी व १ गुजराती चित्रपट प्रदर्शित केले.

१९७२ - एकटा जीव सदाशिव, १९७३ - आंधळा मारतो डोळा, १९७५- पांडू हवालदार, १९७६ - तुमचं आमचं जमलं, १९७७ - राम राम गंगाराम, १९७८- बोटं लावीन तेथे गुदगुल्या, १९८०- ह्योच नवरा पाहिजे, १९८७ - आली अंगावर, १९८८- मुका घ्या मुका, १९९०-पळवा पळवी, १९९२- येऊ का घरात व १९९४- सासरचे धोतर हे चित्रपट त्यांच्या कामाक्षी प्रॉडक्शन ने प्रकाशित केले. १९८१ साली 'गनिमी कावा' त्यांनी दुसर्ऱ्या (बहुदा भालजींच्याच) बॅनरखाली केला.

शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०२०

विणकर दिन विशेष

 विणकर दिन विशेष 

7 ऑगस्ट हा दिवस संपूर्ण देशात राष्ट्रीय विणकर दिवस म्हणून साजरा केला जातो. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विणकर उद्योगातील कामगारांना ट्विटर द्वारे शुभेच्छा दिल्या.

     सद्याच्या युगात सर्वच व्यवसाय टेक्निकल पद्धतीने होत आहे. दिवसेंदिवस तंत्रज्ञान अवगत होत चालले आहे. सुरुवातीच्या काळात विणकाम करून वस्त्र निर्माण करताना, हाताच्या  सहाय्याने धोटे फेकावे व दुसऱ्या हाताने झेलावे लागत होते. या काळात एक नववारी साडी तयारक करण्यासाठी जवळपास ३ ते ४ दिवसांचा कालावधी लागत होता. पुढे विणकाम शटल आले. या पद्धतीमध्ये धोटे एकीकडून दुसरीकडे वेगाने धावत असे. त्यामुळे किमान दररोज एक विणकर मजूर एक साडी विणत होता. परंतु, बदलत्या काळाबरोबर बारिक सुताच्या वस्त्रांची मागणी होऊ लागली आणि विणकाम व्यवसायातही बदल करावा लागला. ४० बाय ४०, ६० बाय ६०, ८० बाय ८० या प्रकारच्या सुतापासून काठपदर असलेली साडी बनवण्यात येऊ लागली. नगरच्या विणकाम व्यावसायिकांनी आपल्या घरी, कारखान्याजवळ साडी सेंडर सुरू केले. हळूहळू ही वस्त्रे खासकरून साडी ‘अॅटोमॅटिक टेक-अप मीशन’ या पद्धतीच्या प्रगत विणकाम  केल्या जाऊ लागली.

            आजच्या ऑनलाइन शॉपिंगच्या काळातील विणकाम व्यवसायाचा मोठ्या प्रमाणात खप होऊ शकतो, हा व्यवसाय दिवसेंदिवस लुप्त होत असताना पाहायला मिळतो. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयच्या वतीने अनेक गोष्टीची कामगारांना मदत होऊ शकते. देशातील जास्तीत जास्त तरुणांना रोजगार मिळवून देणारा व्यवसाय आहे, असे विणकाम उद्योजकाचे म्हणणे  आहे. तसेच ग्रामीण भागातील विणकाम कामगारांना त्यांच्या कलागुणांना वाव देण्यात मोठ्या प्रमाणात मदत होऊ शकते सद्यस्थितीत कापड उद्योगाचे स्पर्धा वाढलेली दिसून येत आहे. त्यामुळे विणकाम उद्योगांना चालना मिळू शकते.

सोमवार, २७ एप्रिल, २०२०

*देश संकटात असताना, धार्मिक रंग देणाऱ्यांना लाज कशी वाटत नाही* .

             
         सर्वप्रथम या लेखातून मी कोणालाही उद्देशून किंवा कोणाच्याही भावना दुखवायचा माझा हेतू नाही. मात्र खेद वाटतोय  सद्यस्थितीतीला  डोळसपणे पाहताना, "सर्व धर्म समभाव" या वाक्याचा अर्थ समजून घेत असताना मनात अनेक प्रश्नचा संचय होतो. देशात आलेल्या महामारीला एकजुटीने लढा देण्यापेक्षा धार्मिक रंग देणे? कितपत योग्य वाटतं या हारामखोरांना. आपण एकत्र लढलो तर जिंकू मग हे आपसातील वादाचे काय लोणचे करायचे का? इथे प्रश्न कोणत्याही एका घटकाचा नाही, कोणत्याही विशिष्ट धर्माचा नाही, संकट हे सकल मानव जातीवर आलेलं आहे. याचा विचार होणे काळाची गरज बनली आहे.
          देशात सध्या Covid - 19 या आजाराने थैमान घातले आहे. याचा सामना करताना सरकार , राजकीय नेते मंडळी, सेवाभावी संस्था मोठ्या प्रमाणात जनतेची सेवा करत आहे. अश्या परिस्थितीत जातीधर्माच्या नावावर वाद घालणे निर्थकच!
भारत देशामध्ये सर्व धर्मातील लोक राहतात. त्यामुळे छोटे-मोठे वाद होणे स्वाभाविक आहे. मात्र अश्या परिस्थितीत एखाद्या विशिष्ट धर्माच्या भावना भडकवून आपण देशाला अधिक संकटात नेत आहोत. याला जबाबदार सर्व भारतीय नाहीत. काही विशिष्ट महाभागांना राजकीय स्वार्थपोटी असे कृत्य सुचतात. सर्व भारतीय गुण्या- गोविंदाने  नांदणाऱ्या या देशात धार्मिक भावना भडकावून तडा निर्माण होत आहे. मग ही पोकळी भरून काढायला बरेच दिवस लागतात. इंग्रज भारतावर राज्य करीत असताना सर्व आपण सर्व भारतीयांनी एकत्र लढून इंग्रजांपासून मुक्ती मिळवली. त्यावेळेस पुढे आले ते सर्व भारतीयच. याचेच अनुकरण करत याच परिस्थितीवर एकत्र मिळून मात केली तर विजय निश्चितच मिळेल.
                  जातीय अस्मितेच्या प्रश्नामुळे बनलेल्या परिस्थितीत हिंसक घटना वाढल्या आहेत. काही विशिष्ट समाजाविरुद्ध सोशल मीडियाच्या  माध्यमातून अफवा पसरवून वैर भावना भडकवल्या जात आहे. अश्या घटनांमध्ये गटातील गरीब, दुर्बल नागरिक बळी पडताना दिसतात. या दडपल्या जाणाऱ्या नागरिकांना मदत करणे आणि आधार देणे हे प्रत्येक लोकशाहीवादी नागरिकांचे कर्तव्य आहे. जेणेकरून अत्याचारग्रस्त नागरिकांना सुरक्षित वाटेल आणि समाजातील सामंजस्य टिकेल.
                 आपण सर्वजण छत्रपती शिवाजी महाराज, शाहू,फुले, आंबेडकर अश्या थोर महामानवांच्या कर्मभूमीत वावरत असताना कुठेतरी या महापुरुषांचे विचार बाजूला ठेऊन स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या अस्तित्वासाठी देशाला धर्मा-धर्मातील वादामध्ये अडकवणाचा प्रयत्न सतत होत असतो. असे प्रश्न सद्यस्थितीत उभे राहिले आहेत असे नाही. देशामध्ये येणाऱ्या प्रत्येक संकटात असे प्रश्न नेहमी उभे असतात. राजकीय हस्तक्षेप होत जातात, धर्मा- धर्मातील वाद उसळत जातात, समाजामध्ये तेढ निर्माण होते. मग या कारणामुळे परिणामी विकृतीला सामोरे जावे लागते. जणू ते आपले कर्तव्य विसरलेच, आणि भरारी घेताय ते स्वतःचे हित जपण्यासाठी. पण अश्यामुळे साध्य तरी काय होत असेल आणि अस्थीत्व टिकणार तरी किती दिवस? मग अशी विकृती करण्याचा काय फायदा? अति तिथे माती होतेच आणि परिणामी त्या मातीलाही मोल राहत नाही.
                आपण भारतातील सुजाण नागरिक आहोत. आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून या परिस्थितीत एकत्र येऊन लढा दिला पाहिजे. तसेच सोशल मीडियावर व्यक्त होताना भावनिक तेढ निर्माण होणार नाही. याची काळजी घेणे देखील गरजेचे आहे. यामुळेच आपण सर्व भारतीय जगासमोर वेगळा दृष्टिकोन बदलेल.

              -- केतन कोलते
               मो. ७७६९८८२६१२
                 औरंगाबाद ..




सोमवार, २० एप्रिल, २०२०

कविता करता आली नाही म्हणून काय झालं ......

कविता करता आली नाही म्हणून काय झालं,
माणूस म्हणून जगता आलं इतकं का कमी झालं,

नाही सुचले शब्द म्हणून काय झालं,
समोरच्याला चांगलं बोलून आपलंसं करता आलं इतकं का कमी झालं,

नाही जुळल्या कवितेच्या चार ओळी म्हणून काय झालं,
आपली नाती - गोती  निभावता आलं इतकं का कमी झालं,

यमक जुळणाऱ्या ओली नाही लिहता आल्या म्हणून काय झालं, आयुष्याचे गणित जुळवता आलं ,इतकं का कमी झालं,

नाही मिरवता आले कवी म्हणून, तर काय झालं,
आपल्या कर्तृत्वातून ताट मानेने जगता आले, इतकं का कमी झाले.....
 
            --  केतन कोलते




मंगळवार, १४ एप्रिल, २०२०

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 129 जयंती 


               महामानव यासाठीच आजही भारत  देश बाबासाहेबांच्या संविधानावर चालतो. आज या बाबासाहेबांची जयंती, अर्थात समाजातील सर्वच घटकासाठी आनंदाचा आणि त्याच्या प्रति कृतन्यता व्यक्त करण्याचा दिवस.
                   प्रत्येक वर्षी मोठ्या उत्साहात, आनंदात आपण जयंती साजरी करतो. यावर्षी कोरोना सारख्या महामारीला देश सामोरे जात आहे, त्यामुळे ही जयंती घरीच साजरी करावी लागणार आहे.
           सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण सर्वांनी खूप चांगल्या पद्धतीने बाबासाहेबांच्या विचारांचा प्रचार, प्रसार केला ही सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे. प्रत्येकजण कोणत्या कोणत्या मार्गाने आपली कृतन्यता  व्यक्त करताना दिसतोय. सांगायचे हेच की घरी राहून सुद्धा आपण चागल्या प्रकारे बाबासाहेबांच्या कार्याला, विचारांना उजाळा घालतोय. प्रशासन आणि सरकारी सूचनांचे पालन करत आपण सर्वजण अद्भूतपूर्ण जयंती साजरी करतोय याचा आनंद आहे.
                    वर्षभरातील 365 दिवसामध्ये आपण संविधानाला धरून चालतो. त्याचप्रमाणे समता,न्याय,बंधुता, एकता, स्वातंत्र्य असा अनमोल ठेवा बाबासाहेबानी दिला. कदाचित याच विचार तुम्हा- आम्हाला जवळ करण्यासारखा आहे.

       अश्या या महामानवाला विनम्र अभिवादन 💐💐
                                 - केतन कोलते

                     

बळीराज्याचं जगणं कठीण होत चाललंय

  बळीराज्याचं जगणं कठीण होत चाललंय               कोरोनाने भारतात प्रवेश केला आणि संपूर्ण देश थांबला. काही अत्यावश्यक सेवा सोडून बाकी सर्व था...